|
|

मंडलच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक जागरुकतेची आवश्यकता - शिवाजीराव मोघे सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०
मंडल आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक जागरुकतेची गरज आहे, त्यासाठी इतर मागासवर्गींयांनीही एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
मंडल स्तंभ वर्धापन दिनाचे औचित्य साधून जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे आयोजित सामाजिक न्याय परिषदेत श्री. मोघे बोलत होते.
श्री. मोघे म्हणाले, मंडल आयोगाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर सतत उभी रहावी व लोकांमध्ये मंडल आयोगाबाबत जाणीव जागृती व्हावी यासाठी मंडल आयोगाचा स्तंभ नेहमी प्रेरणा देत राहील. मंडल आयोगाचा प्रश्न मागासवर्गीयांच्या हितसंबंधाशी निगडीत असल्याने त्याबाबत त्यांनी देखील जागरुक राहिले पाहिजे.
अनुसूचित जाती जमातीप्रमाणेच इतर मागासवर्गीयांसाठी तिसर्या सूचिची आवश्यकता आहे, असे सांगून श्री. मोघे म्हणाले, मागासवर्गीयांसह इतर मागासवर्गीय भटक्या जाती जमाती यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के असल्याने आरक्षणात वाढ करण्याची गरज आहे.
अनुसूचित जाती जमातींच्या जातीचे बोगस प्रमाणपत्र देण्यार्या अधिकार्यांवर तसेच त्याचा गैरफायदा घेणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी संस्थांच्या लोकप्रतिनिधींविरुध्द कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. मोघे यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य गजमल माळी यांचा साहित्य व समाजसेवेतील कार्याबद्दल श्री. मोघे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच व्यसनमुक्तीचा प्रचार करणारे शास्त्रीय गायक छबुराव आहेर यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक चळवळीतील विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|